प्रा. सुनंदा पाटील ( गझलनंदा ) यांची 'आम्ही लेखिका ' च्या अध्यक्षपदी निवड



पुणे ता. २५ दि. महिला साहित्यिकांचे अखिल भारतीय व्यासपीठ असलेल्या ' आम्ही लेखिका ' संस्थेच्या सर्व संचालक मंडळाची २३ मार्च रोजी ऑनलाईन बैठक झाली . या बैठकीत सुप्रसिद्ध लेखिका , जेष्ठ गझलकारा गझलनंदा म्हणजेच प्रा. सुनंदा पाटील यांची आम्ही लेखिका संस्थेच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. त्या स्व . सुरेश भट यांच्या मानस कन्या आहेत.पुणे येथे मुख्यालय असलेल्या या संस्थेच्या उल्का मोकासदार ( उपाध्यक्ष )ऍड.अर्चना नार्वेकर (कार्यवाह )केतकी देशपांडे ( कोषाध्यक्ष )या पदाधिकारी तर पद्मा हुशिंग,सुनिता बाफना,रेणूका पांचाळ

 ममता मुनगिलवार ,मृदुला खैरनार कुलकर्णी या कार्यकारिणी सदस्य आहेत.

सुनंदा पाटील या मूळच्या  गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी या छोट्याशा गावच्या . स्वतःच्या बुध्दीमत्तेच्या जोरावर आणि लेखणीच्या तडाखेबंद हाताने आपले बॅंकीग क्षेत्र आणि साहित्यिक क्षेत्रात मोठी कामगिरी केली.त्यांची  कथा,कादंबरी,, कवितासंग्रह,गझलसंग्रह,ललित लेख आदी विविध प्रकारची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.भारतीय स्टेट बँकेत 'उपप्रबंधक ' पदावरून त्या निवृत्त झाल्या आहेत.त्यांची महाविद्यालयीन शैक्षणिक वाटचाल आणि नोकरी हा अधिकाधिक काळ नागपूर येथे व्यतीत झाला. पुढे प्रमोशन घेऊन त्या मुंबईला गेल्या.

त्यांची साहित्यिक आणि व्यावसायिक वाटचाल दैदिप्यमान अशीच आहे. सुनंदाताईंच्या रुपाने 'आम्ही लेखिका ' संस्थेला एक बहुआयामी अध्यक्ष लाभलेल्या आहेत .

आम्ही लेखिकाचे संस्थापक स्व . मोहन काका  कुळकर्णी यांची स्वप्ने साकार करण्यासाठी मला तुमचे हात हवेत आणि साथ हवी असे आवाहन त्यांनी समग्र लेखिका मंडळीना केले आहे.अध्यक्षपदी निवड झाल्यावर व्यक्त केलेल्या मनोगतात त्या म्हणतात, बाई कुठे काय करते? " हे सर्वत्र ऐकू येत असतानाच, बाई खूप काही करू शकते , हा साक्षात्कार प्रत्येक साहित्यिक स्त्रीला अचानक झाला. " आणि ही जादू घडवून आणली स्व . मोहनकाका कुलकर्णी यांनी.

त्यांच्या हयातीत अनेक उपक्रम राबवले गेले. काही मंचावर तर काही ऑन लाईन . एक गोष्ट इथे जरूर सांगेन की , समुहाचा एक मोठा कार्यक्रम म्हणजे " पहिले ऑनलाईन जागतिक लेखिका मराठी साहित्य संमेलन " जे पाच दिवस सुरू होते . संमेलनाध्यक्ष होत्या जेष्ठ लेखिका मा. ताराताई भवाळकर . आणि महद्भाग्याची गोष्ट म्हणजे त्या संमेलनाची स्वागताध्यक्ष मी होते.२०१८ मधे काही मोजक्याच लेखिकांसह  " आम्ही लेखिका " समुहात घेऊन बीजारोपण झालं . प्रामाणिकपणे सांगायचं झालंच तर काही सन्मान्य अपवाद सोडल्यास अनेक जणींना स्वतःचा चेहरा ओळखताच आला नव्हता. कारणं अनेक होती. पण या समुहात आल्यानंतर त्यांना तो प्राप्त झाला. मुळात मोहन काकांचा उद्देश्यच तो होता , की ज्या प्रतिथयश नाहीत, किंवा ज्यांना मंच मिळालेला नाही , त्यांच्यासाठी आपणच मंच तयार करणे. त्यांना स्वतःची ओळख निर्माण करून देणे. आणि आज त्या एका बीजाचं छानसं झाड झालंय. कुठेकुठे फुलं आलीत . फळंंही धरू लागलीत. आणि भविष्यात तो डेरेदार होणार आहे. अनेक पारंब्यांनी त्याचा विस्तार होणार आहे , याची खात्री आहे. अध्यक्षा प्रा.सुनंदा पाटील आणि सर्व पदाधिकारी व  संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post