कडक लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मागील चार महिन्यांत सर्व व्यवस्थित होते. महाराष्ट्रातच नव्हे, तर अगदी युरोपमध्येसुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखे सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरू झाले होते. आता मोठय़ा प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे.अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नये. हा शेवटचा इशारा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेर सज्जड दम दिला.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेंटर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींशी संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले.मागील वर्षी खासकरून झोपडपट्टीत मोठय़ा प्रमाणावर संसर्ग दिसू लागला होता. यावेळी मात्र तो इमारती, बंगले, सोसायटय़ांमध्ये दिसत आहे. याचे कारण म्हणजे समाजातील या वर्गाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना भेटणे, हॉटेलिंग, मॉल्समध्ये जाणे सुरू झाले आहे, त्यामुळे परिवारांतल्या सर्व सदस्यांत एकदम फैलाव होत आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

नियमांची पायमल्ली

मागील आठवडय़ात केंद्रीय पथक मुंबईत आले असता एका हॉटेलमध्ये त्यांना कोणत्याही कर्मचाऱयांनी मास्क न घातलेला व सुरक्षित अंतर न पाळता गर्दी झाल्याचा अनुभव त्यांनी आपणास सांगितला होता. हॉटेल्स आणि उपाहारगृहे हे भेटीगाठी व जेवण-नाश्त्याचे प्रमुख ठिकाण असून सुरुवातीच्या काळात नियमांचे पालन होताना दिसत होते. हॉटेल्समध्ये समोरासमोर न बसवता सुरक्षित अंतर ठेवून बसविणे, वेटर्स आणि इतर कर्मचारी यांनी मास्क घालणे, जंतुनाशक फवारणी सुरू होती. पण राज्यभरात आता काही हॉटेल्स, मॉल्स, उपाहारगृहांत नियमांची पायमल्ली होऊन वातावरण सैल झाल्यासारखे दिसत असल्याचे त्यांनी हॉटेल प्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिले.

अर्थचक्र सुरू राहिले पाहिजे

अजूनही परिस्थिती आपल्या हातात आहे. आपण स्वतःहून आमच्या एसओपीचे पालन नीट व काटेकोरपणे झालेच पाहिजे हे पहा. सर्व जण नियम धुडकावत नाहीत, पण नियम न पाळणाऱयांमुळे धोका वाढतोय असेही ते म्हणाले. लॉकडाऊन लावून सगळे बंद करणे आम्हालासुद्धा आवडत नाही. आपण हे अर्थचक्र सुरू केले आहे, सर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग रोखता येईल त्यामुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पाडू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सरकारला आश्वासन

एसओपी न पाळणाऱया उपाहारगृहांना संघटनेतून काढून टाकण्याची कार्यवाही केली जाईल. मॉल्समध्ये 40 ते 50 हजार लोक दररोज येतात. मास्क न घालणाऱयांना कोविड मार्शल्स दंड करतील, असे आश्वासन हॉटेल्स आणि उपाहारगृहांच्या संघटनांच्या वतीने गुरुबक्षसिंग कोहली, सुभाष रुणवाल, शिवानंद शेट्टी, श्री रहेजा यांनी राज्य सरकारला दिले.

Post a Comment

Previous Post Next Post