राहुल गांधी कॉंग्रेस चे अध्यक्ष होण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे राज्यव्यापी 'महा स्वाक्षरी अभियान '



पुणे :  सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकारला घालवून धर्मनिरपेक्ष काँग्रेस सरकार देशात आणण्यासाठी राहुल गांधीनी  तातडीने कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे असा  आग्रह धरण्यासाठी  कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या राज्यव्यापी  'महा स्वाक्षरी अभियान 'ची घोषणा पुण्यात करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे  माजी अध्यक्ष अशोक मोरे आणि सहकाऱ्यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या राज्यव्यापी महा स्वाक्षरी अभियानाची घोषणा केली . पत्रकार परिषदेला अशोक मोरे यांच्यासमवेत अनिकेत कोठावळे, अशोक मंगल, आयुष मंगल, उमेश काळे उपस्थित होते.

अशोक मोरे म्हणाले ,'देशातील परिस्थिती बिघडली असून मोदी सरकारविरुद्ध असंतोष वाढत आहे .दुसरीकडे काँग्रेसचा जनाधार वाढत असून राहुल गांधी यांच्या दौऱ्याना तसेच त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना स्वीकारले जात आहे. त्यांचे नेतृत्व सर्वसमावेशक आहे याची खात्री पटू लागली आहे . पाच राज्यातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत . अशा वेळी राहुल गांधी यांनी समर्थपणे काँग्रेस ची धुरा खांद्यावर घ्यावी आणि दमदार पणे देशाचेही नेतृत्व करावे. 

'महास्वाक्षरी अभियान ' हे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यात होईल . प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते ,हितचिंतक आणि नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील . काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीदरम्यान सर्व स्वाक्षऱ्या सादर केल्या जातील ,असेही अशोक मोरे यांनी सांगितले. 

काँग्रेस हा  वैभवशाली  परंपरा असलेला पक्ष असून सर्व राज्यात पक्ष संघटना आहे . पक्षासह देशाला गत वैभव देण्यासाठी राहुल गांधी सक्षम आहेत.त्यांच्या प्रगल्भ पणाबद्दल कोणालाही शंका नाही ,असेही मोरे यांनी यावेळी सांगितले .  यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अभियानाच्या फलकावर स्वाक्षऱ्या करून प्रारंभ करण्यात आला . 

काँग्रेसची ताकद ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांकडून येते. आम्हा कार्यकर्त्यांच्या मनात काँग्रेस पक्षाविषयी जे प्रेम आणि आस्था आहे तीच काँग्रेस पक्षाची ताकद आहे.आज सर्व वैधानिक संस्था व माध्यमे भाजपाच्या पाशवी सत्तेपुढे लोटांगण घालत असताना एकटे राहुल गांधी देशभर फिरून भाजपच्या विषारी प्रचाराचा व फुटीरतावादी धोरणांचा प्रतिकार करत आहेत.

राहुल गांधी ही आमची आशा आहे आणि त्यांना पंतप्रधान बनवण्याची आमची महत्वाकांक्षा आहे.भाजपच्या विषारी प्रचारामुळे देश मानसिक दृष्ट्या दुभंगतो आहे. अशा वेळी देश वाचवण्यासाठी भाजपला सत्तेतून हटवून राहुल गांधींना पंतप्रधान पदी बसवणे महत्वाचे आहे. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होणे यासाठी महत्वाचे आहे .आम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आजपासून या मोहिमेला सुरुवात करत आहोत.



Post a Comment

Previous Post Next Post