“इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी स्थिती



भिगवण- मागील वर्षभर थैमान घातलेल्या आणि लस येऊनही आटोक्‍यात न आलेल्या करोनाने केवळ मानवी आरोग्यावरच संकट आणलेले नसून त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थाच मोठ्या संकटातून जात असल्याचे दिसून येत आहे. विविध व्यावसायिकांसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहे. “इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी स्थिती आहे.

सध्या प्रचंड प्रमाणात वाढती बाधित रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनला आहे. पण व्यावसायिकांच्यापुढे वेगळ्याच समस्या उभ्या ठाकल्या आहेत. मागील वर्षात व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे संचित पुंजी संपल्याने रोजच्या गरजांची पूर्तता करायची असल्यास व्यवसाय सुरू ठेवावा लागत आहे. मात्र, नेहमीप्रमाणे ग्राहक येत नाहीत, मालाला उठाव नाही. व्यवसायाची आवश्‍यकता म्हणून माल खरेदी करून ठेवावा तर न पुन्हा टाळेबंदी झाली तर मोठे नुकसान होईल, अशा द्विधा मनस्थितीत हे व्यावसायिक जगत आहेत.

फळे, भाज्या, मसाले तसेच इतर छोट्या वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची स्थिती बिकट आहे. आठवडे बाजार बंद आहेत. याबाबत फळ विक्रेते सचिन पाचांगणे म्हणाले की, कुटुंबाची गरज म्हणून करोनाची भीती असूनही व्यवसाय करीत आहे. पण टाळेबंदीची टांगती तलवार समोर असताना विक्रीसाठी माल खरेदी करावा का, हा प्रश्‍न सतावत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post