सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ ..जलसंपदा मंत्री जयंत पाटील



 सांगली : सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ झालेलं आहे. भाजप किती अत्यवस्थ झालेलं आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर यांची विधाने आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.  

जेजुरीतल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरुन भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पवार जातीयवादी आहेत. त्यांच्या हातून अहिल्याबाईच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये, अशी भूमिका घेत पडळकरांनी पवारांवर शाब्दिक हल्ले केले.याच सगळ्या प्रकरणावरुन जयंत पाटील यांनी पडळकरांचा समाचार घेतला.

सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ झालेलं आहे. भाजप किती अत्यवस्थ झालेलं आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर यांची विधाने आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, त्यांना किती फस्ट्रेशन आले आहे हे यातून स्पष्ट होते, असंही ते म्हणाले.

पडळकरांचं बोलणं हे सुसंस्कृत राजकारणाला शोभत नाही. ते नेहमी बेताल वक्तव्य करत असतात. पडळकरांचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती, अशा शेलक्या शब्दात जयंत पाटील यांनी पडळकरांवर हल्ला चढवला. सत्ता मिळविण्यासाठी एन-केन मार्गाने प्रयत्न सुरु असल्याचे यातून स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली.

जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार होते. मात्र, अहिल्यादेवींच्या पुतळ्याला शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्याचे हात लागता कामा नये, असे सांगत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारीच जेजुरी गडावर जाऊन या पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला. या सगळ्या प्रकारानंतर पडळकरांवर गुन्हाही दाखल झाला.

Post a Comment

Previous Post Next Post