नवी दिल्ली - न्यायालयात न्याय मिळतो पण, एवढा विलंब होतो की, त्या न्यायाचे महत्त्वही राहात नाही, असं आपण चित्रपटामध्ये अनेकदा ऐकलं. तर महाराष्ट्रात शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे उपहासात्मकरित्या म्हटले जाते. मात्र वकिल आणि न्यायाधीशांसाठी न्यायालय आणि न्यायदेवतेवर विश्वास असतो. मात्र माजी सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यामुळे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्याची शक्यता आहे.
आता थेट न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर राहिलेल्या व्यक्तीनेच देशातील न्यायव्यवस्थेवर टीका केली आहे. आपल्या देशातील न्यायव्यवस्था इतकी बोथट झाली आहे की लोकांना न्यायालयात गेल्याचा पश्चाताप होतो, अशी टीका माजी सरन्यायधीश व राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी केली देशातील न्यायव्यवस्था इतकी जर्जर झाली आहे की न्यायालयातील न्याय हा सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर गेला आहे. फक्त सधन व कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकंच न्यायालयाकडे जातात. त्यामुळे सध्या ज्या प्रकारची परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी या क्षेत्रातील लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशा शब्दात गोगोई यांनी न्यायव्यवस्थेला फटकारले आहे.
आपली न्यायव्यवस्था जर्जर झाली आहे. 2020 मध्ये न्यायव्यवस्थेसहीत सर्वच क्षेत्रातील कामकाज मंद झाले आहेत. याकाळात सेशन कोर्टात 60 लाख केसेस आल्या आहेत तर हायकोर्टात 3 लाख व सुप्रीम कोर्टात सहा ते सात हजार केस आल्या आहेत. त्यामुळे आता या सर्व केस सोडविण्यासाठी आपण एक रो़डमॅप तयार केला पाहिजे. न्यायपालिका प्रभावी केली पाहिजे. हे खूप महत्त्वाचे आहे', असे गोगोई यांनी सांगितले आहे.