राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉक डाऊन घोषित करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 


मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉक डाऊन घोषित करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये करोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय असून तिथे लॉकडाउन लावण्याचा विचार केला जात आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. “अमरावतीत रुग्णसंख्या वाढली आहे. जवळपास संपूर्ण कुटुंबाला करोना ग्रासलं आहे. त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीत या तीन शहरांसाठी काय निर्णय घ्यायचा? त्यात ग्रामीण भागही घ्यायचा का? यासंबंधी चर्चा होणार आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

“आपल्याकडून डॉक्टर साळुंखे यांना आम्ही आढावा घेण्यासाटी पाठवलं होतं. त्यांनी सकाळीच मला सांगितलं, आपण येथील चौकात असून कोणीही मास्क वापरत नाही. संख्या झपाट्याने वाढत असताना कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याची चर्चा झाल्यानंतर मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी बोललो. १२.३० वाजता बैठक होणार असून शहरापुरता लॉकडाउन ठेवायचा की संपूर्ण जिल्ह्याला लागू करायचा याबद्दल अंतिम निर्णय होईल,” अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

“लग्नकार्य महत्वाचं आहे की करोनामध्ये माणसांना वाचवणं महत्वाचं आहे? नवरा, मुलगा आणि काही ठराविक लोक अशी लग्न झाली ना…परिस्थिती हाताबाहेर गेली आणि हे रोखायचं असेल तर सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं, सॅनिटायझर, स्वच्छता या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याकडे जानेवारी अखेपर्यंत रुग्णांच्या तुलनेत डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या जास्त होती. पण १ फेब्रुवारीपासून पॉझिटिव्हची संख्या वाढू लागली आहे. त्यातही अमरावती, नागपूर, वर्धा आणि काही प्रमाणात नाशिकमध्ये दिसत आहे,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

Post a Comment

Previous Post Next Post