कोरोना रुग्ण वाढल्याने कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात येण्यास बंदी घातली


मुंबई  : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालला आहे. त्यामुळे सरकार, आरोग्य यंत्रना पुन्हा एकदा सज्ज होत आहे. कोरोना रुग्ण वाढल्याने कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात येण्यास बंदी घातली आहे. कर्नाटकात कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारने प्रवेशबंदी केली आहे. केवळ 72 तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह असलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.



कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक सरकारकडून प्रत्येक प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना परत पाठवले जात आहे. कोगनोळी नाक्यावर अचानक तपासणी सुरू करण्यात आल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या प्रवाशांना रांगेत तास न् तास अडकून राहवं लागत आहे. तसेच काही प्रमाणात वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र आणि केरळ राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याची धास्ती कर्नाटक सरकारने घेतली आहे. कर्नाटक सरकारने आता त्यांच्या राज्यात बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. यासाठी महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट उभे करण्यात आलेले आहेत. सांगली जिल्हा लगतच्या कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाऱ्या कागवाड या ठिकाणी कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु झालेली आहे. या चेकपोस्टवर प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग आणि मास्क तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना टेस्टची विचारणा करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना नियम पाळण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. पोलीस आणि आरोग्य प्रशासनाकडून प्रत्येक वाहनांची तपासणी करुनच कर्नाटकमध्ये प्रवेश देण्यात येत आहे..

Post a Comment

Previous Post Next Post