जम्मू-काश्मीरपासून महाराष्ट्र, तामीळनाडूपर्यंत शेतकऱ्यांनी 'चक्का जाम' आंदोलन करून मोदी सरकारला आपली ताकद पुन्हा दाखवून दिली आहे. देशभरात तीन तास राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आले. दरम्यान, सरकारच्या दबावापुढे हे आंदोलन झुकणार नाही. 2 ऑक्टोबरपर्यंत कृषी कायदे मागे घ्या, असा अल्टिमेटमच भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला दिला आहे.
72 दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या सिंघू, गाझीपूर आणि टिकरी सीमांवर शेतकऱ्यांचे जबरदस्त आंदोलन सुरू आहे. थंडी-पावसात हजारो शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारकडून सीमांवर खिळे ठोकले, मल्टिलेअर बॅरिकेड्स उभारून तारांचे कुंपण व्यापले तरी शेतकरी मागे दुपारी 12 ते 3 या वेळेत चक्का जाम आंदोलनाची हाक संयुक्त किसान मोर्चाने दिली होती. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता हे आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार देशभरात सर्वत्र 'चक्काजाम' आंदोलन शांततेत झाले.
राकेश टिकैत यांचा इशारा
- तीन कृषी कायदे रद्द होईपर्यंत शेतकरी आंदोलन सुरूच ठेवतील. सरकारच्या दबावापुढे आम्ही झुकणार नाही. गाझीपूर सीमेवरून हटणार नाही. 2 ऑक्टोबरपर्यंत सरकारला आम्ही अल्टीमेटम दिला आहे. जर तोपर्यंत कायदे मागे घेतले नाहीत, तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी गाझीपूर सीमेवरून दिला आहे.
- आंदोलन दीर्घकाळ सुरू ठेवण्यासाठी राकेश टिकैत यांनी एक फॉर्म्युला दिला आहे. आंदोलन करणाऱया शेतकऱयांनी प्रत्येक गावातून एक ट्रक्टर, 15 समर्थक आणि 10 दिवस आंदोलनस्थळी राहण्याचा हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर आंदोलन 70 वर्षे चालले तरी काही हारकत नाही, असे टिकैत यांनी सांगितले. आपण देशभर दौरा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
जम्मू-कश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत आंदोलन
- सिंघू, गाझीपूर, टिकरी सीमांवर आंदोलन सुरू असल्याने आज 'चक्काजाम'मधून दिल्ली, उत्तरप्रदेश, उत्तराखंडला वगळण्यात आले होते. दिल्लीत शेतकऱयांचे आंदोलन नव्हते तरी प्रचंड सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली. दहा मेट्रोस्टेशन बंद ठेवण्यात आले. मध्य दिल्लीतील शाहीदी पार्क येथे 'चक्काजाम' केले गेले. यावेळी 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
- पंजाब आणि हरियाणात प्रचंड आंदोलन झाले. पंजाबमध्ये 15 जिह्यात सर्व राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आले. ट्रक, ट्रक्टर, ट्रॉली रस्त्यांवर आडव्या लावण्यात आल्या होत्या. अमृतसर, अंबाला, भटिंदा, बर्नाला आदी ठिकाणी 'चक्काजाम' झाले. यात महिलांचाही मोठा सहभाग होता. हरियाणात दिल्लीकडे जाणारा महामार्ग रोखला. अनेक ठिकाणी घोषणाबाजी करीत ड्रम वाजविण्यात आले. अॅम्ब्युलन्स, स्पूल बसला मार्ग मोकळा करून देण्यात आला.
- तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथेही आंदोलन केले गेले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
महाराष्ट्रातही आंदोलन
- पुण्यात हडपसर येथील शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पुणे सोलापूर महामार्गावर 'चक्का जाम' आंदोलन करत वाहतूक रोखली.
- कोल्हापुरात स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवार धुंदलवाडी येथे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली माकपाने रास्ता रोको केला.
- वर्धा-नागपूर मार्गावर पवनार येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात आला.
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली निफाड येथील नाशिक-संभाजीनगर महामार्गावर चक्का जाम.
- परभणी-गंगाखेड महामार्गावरील पिंगळगढ नाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तर पोखर्णी फाटा येथे शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.