कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून कोरोना निर्बंध लागू



महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली आहे. यामुळे यापूर्वी घातलेल्या निबंधाची कडक अमंलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सांयकाळी पोलिस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. या निबंधाचे उल्लघंन करणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही या आदेशात स्पष्ट केले आहे. 

खासगी डॉक्टरांकडे तपासणीसाठी आलेल्या रुग्णाला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्यास त्याची कोरोना तपासणी करणे अनिवार्य राहील असेही या आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधत्माक उपाय योजना राबविण्यास जिल्हा प्रशासनाने सुरवात केली आहे.   यापार्श्वभूमीवर यापूर्वी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात यापूर्वी लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत दि.२८ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत वाढवली आहे. या कालावधीत यापूर्वी लागू केलेले निर्बंधांची कडक अमंलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. राजकीय सभा, मोर्चे, आंदोलने, मिरवणुका, संमेलन तसेच सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजनास बंदी घालण्यात आली आहे. हे कार्यक्रम बंदिस्त जागेत असतील तर त्याच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच प्रवेश देता येईल पण त्याकरिता पोलिस व स्थानिक प्राधिकरणाची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. 

विवाह समारंभास ५० लोकांना तसेच अत्यविधीच्या कार्यास जास्तीत जास्त २० व्यक्तिंना उपस्थित राहता येणार आहे. बंदिस्त सभागृहात होणारे सांस्कृतिक कार्यक्रमास क्षमतेच्या ५० टक्के प्रवेश राहील. त्यापेक्षा जास्त व्यक्ति उपस्थित असतील, तसेच विवाहासाठी ५० पेक्षा अधिक लोक उपस्थित असतील तर संबधित आयोजक व सभागृहाचे व्यवस्थापक यांच्यावर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करावी, प्रसंगी ती कार्यालये सील करावी असेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. शाळा, महाविद्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू राहणार आहेत, मात्र, सोशल डिस्टनसिंग मास्कचा वापर करावा लागणार आहे. हॉटेलमध्ये क्षमतेच्या ५० टक्केच लोकांना प्रवेश देता येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post