राज्यातील आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून रद्द.

राज्यातील आणखी एका सहकारी बँकेचा परवाना आरबीआय कडून रद्द. 


मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील काही बँकाच्या आर्थिक घोटाळ्यानंतर त्यांचा परवाना आरबीआय कडून रद्द करण्यात आला आहे. त्यातच आता राज्यातील आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उस्मानाबादमधील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन्स रिझर्व्ह बँकेकडून रद्द करण्यात आले आहे. या कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील सहकारी बँकांवर भारतीय रिझर्व्ह बँकेने टाच आणली आहे. त्यानंतर आता उस्मानाबादेतील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. आजपासून या बँकेला व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. आरबीआयने वसंतदादा सहकारी बँकेवर कारवाईबाबत एक पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात अनेक आरोप ठेवले आहे. बँक ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात असमर्थ असल्याचा दावा करण्यात आला आहे.

आता बँकेचा परवाना रद्द झाल्यामुळे लिक्विडेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. ठेवीदारांचे पैसे आता परत देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आरबीआयच्या कारवाईमुळे ठेवीदारांची 5 लाखांपर्यंतची रक्कम ही सुरक्षित आहे. त्यामुळे बँकेतून 5 लाखांपर्यंतच पैसे मिळणार आहे. वसंतदादा नागरी सहकारी बँकेतील 99 टक्के खातेदारांचे पैसे हे परत देण्यात येणार आहे.

रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्राच्या कमिशनर फॉर कॉर्पोरेशन आणि रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीला आदेश दिले आहे. त्यानुसार, आता वसंतदादा नागरी बँकेचे कामकाज बंद केले जाणार आहे. बँक लवकर दिवाळखोरीत काढली जाणार आहे.

याआधी आरबीआयने मुंबईतील सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँक, कोल्हापूरमधील सुभद्रा लोकल एरिया बँक, जालन्यातील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, साताऱ्यातील कराड जनता बँकेचे परवाने रद्द केले होते. त्यानंतर आता उस्मानाबादेतील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post