नांदेड.

 

व्यवस्थेने सर्जकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले -अमर हबीब

किसानपुत्रांच्या 7 दिवसांच्या ऑनलाईन शिबिराचा समारोप

 PRESS MEDIA LIVE :  नांदेड :

शेतीचा शोध स्त्रीयांनी लावला तर शेतीमध्ये नवनिर्मितीचे कार्य शेतकऱ्यांनी केले. हे दोनहीं घटक सर्जक आहेत परंतु आजच्या व्यवस्थेने शेतकरी व स्त्री या दोन्ही सर्जकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. असे प्रतिपादन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले. ते किसान पुत्र आंदोलनाच्या मराठवाडा विभागीय ऑनलाईन शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते.

अमर हबीब म्हणाले की, आजच्या व्यवस्थेमध्ये अनेक समस्या आहेत. या समस्येवर केवळ शेतकरी हाच घटक मात करू शकतो. कारण शेतकरी हा नवनिर्मिती करणारा घटक आहे. शेतकऱ्याने शेती उत्पादनाची निर्मिती केल्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा ओढला जातो म्हणून शेतकरी हा या व्यवस्थेचे इंजिन आहे. शेतकरी जर थांबला तर आपली सर्व व्यवस्था थांबेल. अशाप्रकारे शेतकरी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा असूनही आजच्या समाजवादी विचाराच्या व्यवस्थेने शेतकरीविरोधी वेगवेगळे कायदे करून शेतकऱ्यावर अनेक बंधने लागलेली आहेत. या शेतकरी विरोधी कायद्याने शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे.

स्त्रियांमध्ये विशिष्ट कार्य करण्याचे अंगभूत गुणधर्म असतात. स्त्री ही आस्टावधानी आहे. कारण स्त्री ही एकाच वेळी अनेक प्रकारचे कार्य करू शकते. जैविकदृष्ट्या  स्त्री मध्ये पुरुषापेक्षा काही वेगळ्या क्षमता असतात. असे असूनही या व्यवस्थेने स्त्रीच्या क्षमता मारलया. त्यांना संधी दिली नाही. या व्यवस्थेने स्त्रियांचे स्वातंत्र्यही नाकारले आहे. शेतकरी व स्त्री या दोन्ही सर्जकाना विविध कायद्याची बंधने टाकून स्वातंत्र्य नाकारले आहे. यामध्ये प्रामुख्याने सिलिंगचा कायदा, आवश्यक वस्तू कायदा ,जमीन अधिग्रहण कायदा असे अनेक कायदे आहे की जे कायदे या सर्जकांच्या विरोधी आहेत . हे कायदे रद्द होणे आवश्यक आहेत.


यावेळी राजीव बसरगेकर यांनी ही मनोगत व्यक्त केले. त्यांच्या मते शेतीची कामे पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त अधिक चांगल्या पद्धतीने करताहेत जैविक दृष्ट्या महिलांची कार्यक्षमता ही पुरुषापेक्षा अधिक आहे. असे असूनही त्यांना योग्य संधी मिळत नाही.

 याच कार्यक्रमात प्रा डॉ शैलाजा बरुरे यांनी मत मांडले .त्यांनी किसानपुत्र आंदोलन ग्रामीण भागांमध्ये सुरू करण्यासाठी लोकसहभाग वाढवावा अशी सूचना केली.

7 ते 14 सप्टेंबर 20 या कालावधीत झालेल्या किसानपुत्रांच्या मराठवाडा विभागीय शिबिराचे उद्घाटन प्रा डॉ शैलजा बरुरे यांनी केले. सिलिंगचा कायदा या विषयावर सुभाष कछवे (परभणी), आवश्यक वस्तू कायदा- बालाजी आबादार (नांदेड), जमीन अधिग्रहण कायदा- ऍड अनंत बावणे (लातूर), शेतकरीविरोधी घटनादुरुस्त्या- एड. डी.एस कोरे (लातूर-पुणे) व कायदे रद्द करून घेण्यासाठी किसानपुत्र आंदोलन या विषयावर नितीन राठोड (उस्मानाबाद-पुणे) यांनी मार्गदर्शन केले. संगीता देशमुख (वसमत, हिंगोली) यांनी सर्जकांचे स्वातंत्र्य या विषयावर विचार मांडले. याचबरोबर दत्ता वालेकर (बीड), अंकुश खानसोळे (नांदेड),  सुधाकर गोसावी (बीड) प्रा डॉ विकास सुकाळे (नांदेड) यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

     या शिबिरातील सर्व पाहुण्यांचा परिचय नितीन राठोड यांनी करून दिला, तर शिबिराच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी श्री मयुर बागुल अंकुश खानसोळे व असलम सय्यद यांनी सांभाळली. या शिबिरांमध्ये मराठवाडा व मराठवाडा बाहेरील तसेच बेळगाव कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यातील विविध शिबिरार्थी व किसानपुत्र उपस्थित होते.

(संकलन- डॉ विकास सुकाळे, नांदेड.)


मयुर बागुल - 9096210669

Post a Comment

Previous Post Next Post